‘हिणकस राजकारणाला बंगाली चपराक!’
(लेखक : लोकनाथ काळमेघ)
भाजप नेत्यांची जी विधानं वादग्रस्त ठरतात, ती प्रामुख्याने असतात इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना उद्देशून. त्यांच्या विधानाने कधी जात अथवा धर्माच्या वादाला तोंड फुटते. कधी महिला नाहीतर शेतकऱ्यांबाबत ते हिणकस विधान करतात आणि जनतेचा रोष ओढवतात. प्रामुख्याने भाजप नेत्यांच्या विधानांचा जर नीट विचार केला तर त्यामागे पद्धतशीर डावपेच दिसून येतात, ते म्हणजे कधी आपल्या वोटबँकेला खूश करायचे, तर कधी विरोधकांच्या वर्मावर बोट ठेवायचे. वोटबँकेला चुचकारण्यासाठी काहींचा विरोध पत्करण्याची खेळी ते खेळत असतात. मात्र, हे फार काळ टिकू शकत नाही.
अमित शाह-नरेंद्र मोदी ही अजूनही भारतीय राजकारणातील ‘जोडी नंबर वन’ आहे, पण भासवत असल्याप्रमाणे हे दोघे अगदीच राजकारणातील चाणक्य वगैरे काही नाहीत, हे सिद्ध झाले आहे. मुळात, उत्तर प्रदेशचा दणदणीत विजय आणि त्यापेक्षाही खासकरुन बिहारमधील खेळीनंतर विरोधकांना पराभूत मानसिकतेने ग्रासले होते. काँग्रेस अजूनही चिंतित आहे, कारण मोदी-शाह जोडीकडे कुठलातरी असा हुकुमाचा एक्का असेल, ज्यामुळे शेवटी ते विरोधकांना हरवतीलच, असं त्यांना खात्रीने वाटत असावं. यामागचे मानसशास्त्र म्हणजे, जेव्हा तुम्ही एकापाठोपाठ एक निवडणुका हरायला लागता, तेव्हा राजकारण हे खेळाप्रमाणेच, आकड्यांच्या खेळाइतकेच मानसिक लढाईही बनते. ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना तर मोदी-शाहांवर मात करताच येणार नाही असा आतूनच विश्वास वाटू लागला होता. उलटपक्षी, स्वतःला आधुनिक चाणक्य समजणाऱ्यांच्या गर्वाची पातळी खाली येऊ शकते, हे नुकत्याच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीने दाखवून दिले. थोडक्यात, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीने ‘भारताचे राजकीय भवितव्य’ स्पष्ट केले आहे.
राजकारणात टीका चालून जाते, पण ती टीका सहन करण्याच्या शक्तीला एक विशिष्ट मर्यादा आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजपच्या एका नेत्याने ममता बॅनर्जी यांचा ‘अभद्र व संस्कारहीन कजाग बाई’ असा उल्लेख केला होता. वास्तविक ममता या कष्टकरी निम्न जातीवर्गात कार्यकर्त्या म्हणून बेमालुमपणे मिसळत आल्या आहेत, याची साक्षीदार पश्चिम बंगालची जनता आहे. त्यांची ही जनसामान्यातील लोकप्रिय प्रतिमा पुसून काढण्यासाठी संघ-भाजपने अक्षरशः ममता बॅनर्जी यांच्या चारित्र्यहननाची प्रचार मोहीमच उघडली होती. राजकारणात सहभागी असलेल्या स्त्रियांच्या पोशाखावरून जाहीर अर्वाच्य टिपण्या करण्याची खोड भाजप नेत्यांच्या रक्तातच आहे. यावेळीही एका ६६ वर्षाच्या महिलेबद्दल आपण काय बोलत आहोत, याचे भान भाजप नेत्यांना नाही, असेच दिसून आले. ‘साडी की बर्म्युडा चड्डी’ अशी जाहीर टिपणी भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जी यांच्याबद्दल केली होती. “त्यांनी साडी नेसली आहे आणि एक पाय झाकलेला आहे पण दुसरा नाही. जर त्यांना त्यांचा पाय दाखवायचाच असेल, तर त्यांनी बर्मुडा घालावा. त्यामुळे अधिक व्यवस्थित दिसू शकेल”, अशा प्रकारचे घाणेरडे व बेताल वक्तव्य घोष यांनी करताच पश्चिम बंगालच्या महिला-भगिनींचा रोष भाजपने ओढवून घेतला. बंगालमधील स्त्री-मतदारात ममता दीदींची लोकप्रियता अधिक उठून दिसणारी बाब आहे. तृणमूलने इतर कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षांच्या तुलनेत अधिक स्त्री-उमेदवार निवडणुकीत उभे केले होते. यावेळीही ५० स्त्री-उमेदवार निवडणुकीत उभ्या होत्या. भाजपने मात्र आजवर स्त्रीहिंसेचा प्रश्न ‘जात-जमातकेन्द्री’ बनवला आहे, हे पश्चिम बंगालच्या जनतेच्या सहज लक्षात आले.
“मैं तो फकीर हूँ, झोला उठाऊंगा और चल दूँगा’’, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणत असतात. मात्र, यावेळच्या निवडणुकीत बंगाली जनतेने आजपर्यंत निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने बाहेरून आलेले नेते आणि एवढा पाण्यासारखा पैसा कधीच बघितला नव्हता. सार्वजनिक आयुष्यातील प्रामाणिकपणा व फकिराच्या नेतृत्वाखालील पक्ष वगैरे गप्पांशी याचा मेळ कुठेच बसला नाही. राज्यातील धनाढ्य व्यापारी भाजपवर पैसा उधळत होते. आलिशान एसयूव्हींमधून प्रवास करत भाषणे ठोकणारे भाजप नेते बघून राजकीयदृष्ट्या सजग बंगाली जनता अवाक् झाली. २००हून अधिक चार्टर्ड विमाने व हेलिकॉप्टर्स कोलकाता ते बागडोगरा फेऱ्या मारत होती. हे बंगालच्या इतिहासात कधीच घडले नव्हते.
यावेळेस भाजपची हीन अभिरूची आणि ‘छिछोर वृत्ती’ यांवर बंगाली जनतेने उघड संताप व्यक्त केला. प्रधानमंत्री मोदी हे ममता बॅनर्जी यांच्यासाठी “दीदीऽ ओऽऽ दीदीऽ!” सारखे हिणकस संबोधन वापरतात हे तर त्यांच्यासाठी धक्कादायकच होते. सुसंस्कृत समाजाने यावर उघड टीका केली आणि भाजपला मते देऊ नका, असे आवाहन केले. कोविड साथीच्या दुसऱ्या लाटेतील मोदींचे बेजबाबदार वर्तन या संतापात भर घालणारे ठरले. हे तेवढेच खरे, की बंगालमध्ये अनेक दोष आहेत, येथील कार्यनीतीमत्ता ही एक समस्या आहे, जनतेला कर्तव्यांहून हक्कांची जाणीव अधिक आहे. मात्र, आपल्या मूल्यांना धक्का पोहोचवणाऱ्यांच्या विरोधात लोक एकत्रितपणे उभे राहू शकतात हे कालपर्यंत कल्पनेबाहेरील वाटत होते, ते पश्चिम बंगालमध्ये दिसून आले.
भाजप नेत्यांची जी विधानं वादग्रस्त ठरतात, ती प्रामुख्याने असतात इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना उद्देशून. त्यांच्या विधानाने कधी जात अथवा धर्माच्या वादाला तोंड फुटते. कधी महिला नाहीतर शेतकऱ्यांबाबत ते हिणकस विधान करतात आणि जनतेचा रोष ओढवतात. प्रामुख्याने भाजप नेत्यांच्या विधानांचा जर नीट विचार केला तर त्यामागे पद्धतशीर डावपेच दिसून येतात, ते म्हणजे कधी आपल्या वोटबँकेला खूश करायचे, तर कधी विरोधकांच्या वर्मावर बोट ठेवायचे. वोटबँकेला चुचकारण्यासाठी काहींचा विरोध पत्करण्याची खेळी ते खेळत असतात. मात्र, हे फार काळ टिकू शकत नाही. तुम्ही लोकांच्या आई-बहिणींचे चारित्र्यहनन करून राजकारण करु शकत नाही. याउलट भाजपने पश्चिम बंगालमध्ये केले. बंगालमध्ये अगदी जमिनीवर काम करणाऱ्या मुख्यमंत्री महिलेविषयी अर्वाच्य विधाने करणे भाजपला व मोदींना भोवले आणि बंगाली जनतेने या हिणकस राजकारणाला चपराक लगावली. यावेळी मोदींचा पराभव झाला किंवा तृणमूल काँग्रेसचा विजय झाला, हा मुद्दा येथे महत्त्वाचा नाही. महत्त्वाचे आहे ते एकाधिकारशाहीला व तानाशाहीला जनता कशी पिटाळून लावू शकते हा मुद्दा. त्यामुळे पर्यायाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा पश्चिम बंगालमधील पराजय हा लोकशाहीवाद्यांसाठी आशेचा किरण आहे आणि मोदींचा करिष्मा निरुपयोगी ठरू शकतो, हेसुद्धा यावरून सिद्ध होते.
सरतेशेवटी, तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल ममतादीदींचे अभिनंदन व सदिच्छा..!
मो.: ९०९६४९४८९४
इमेल : loknathkalmegh@gmail.com