Friday, 17 April 2020


मुंबईत गोंधळ आणि 'ती' चांडाळचौकडी

🖋️ लोकनाथ काळमेघ


१३ एप्रिलला मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येने मजूर रस्त्यावर उतरले होते. त्यांची प्रामुख्याने एकच मागणी होती, मूळ गावी जाऊ द्या. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मीडियावर भलीमोठी चर्चा रंगात आली आणि ही चर्चा थेट मुस्लिम आणि मस्जिद या विषयापर्यंत पोहोचली. अशावेळी संपूर्ण भारतभरातील घडामोडींचा देशवासीयांना विसर पडला. त्याचवेळेस अशीच गर्दी गुजरातमधील सुरत येथेही झाली होती, पण या बातमीची बोंब कुठेच झाली नाही.

वांद्रेत झालेल्या गर्दीची बातमी खालील लिंकवर.
https://www.indiatoday.in/india/story/lockdown-woes-mumbai-stations-flooded-with-migrant-labourers-hoping-to-get-back-home-1666908-2020-04-14

सुरतमध्ये झालेल्या गर्दीची बातमी खालील लिंकवर.
https://news.abplive.com/videos/news/india-shocking-thousands-of-labourers-gather-at-surats-varachha-area-1197776

हा घटनाक्रम थोडा अधिक बारकाईने तपासला जाणे गरजेचे आहे, कारण सध्याचा विषय हा जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवरील 'फिजिकल डिस्टन्सिंग'शी संबंधित आहे. १४ एप्रिलला सकाळी ११:२९ वाजता 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीवर "लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांसाठी विशेष जनसाधारण ट्रेन सुरु होणार", अशा हेडिंगखाली एक बातमी झळकते. जेव्हा की त्याच्या दीड तासाआधीच प्रधानमंत्री मोदी सगळ्याच वृत्तवाहिन्यांवर राष्ट्राला संबोधित करताना ३ मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्याचे स्पष्ट करतात. 'एबीपी माझा' दक्षिण मध्य रेल्वेच्या एका गोपनीय नोटिसच्या आधारे हे वृत्त प्रसिद्ध करते. याठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की, लॉकडाऊनमध्ये मुदतवाढ होणार, हे निश्चित असताना किंवा लॉकडाऊन संपणार असल्याबद्दल संभ्रम असतानाही रेल्वेची ही गोपनीय नोटिस, काही चॅनेलवाल्यांपर्यंत पोहोचतेच कशी?
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून 'एबीपी माझा'ने वापरलेली दक्षिण मध्य रेल्वेची नोटिस पाहता येईल

घटनाक्रम इथेच थांबत नाही. यापुढेही संध्याकाळी जेव्हा वांद्र्यात मोठी गर्दी होते आणि देशभरात गोंधळ होतो, त्यानंतर दोन प्रकारचा प्रोपगंडा ऐकायला मिळतो, ज्यामधून धार्मिक द्वेषभावना निर्माण करू पाहणाऱ्या प्रवृत्तीची दुर्गंधीसुद्धा येते. एक म्हणजे, यामागे केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री मोदींना टार्गेट करण्यासाठी कुणीतरी हे षड्यंत्र आखले असावे, अशा बातम्या सोशल मीडियावर झळकतात आणि तशा प्रतिक्रियाही उमटतात. दुसरे म्हणजे वांद्र्यात जिथे हे रेल्वे स्टेशन आहे, तिथेच एक मस्जिदसुद्धा आहे, त्यामुळे ही गर्दी जमवण्यामागे मुसलमान नेत्यांचा हात तर नाही ना? या मुद्द्यावर न्यूज वाहिन्यांवर तुफ्फान डिबेट रंगात येते. यातही विशेष एकच दिसून आले की, नेहमीप्रमाणे याही प्रकरणाला मुस्लिम अँगल देण्यात आला. आता मुख्य मुद्द्यावर येताना, ज्या एबीपी न्यूज चॅनेलने या बातम्या प्रसारित केल्या, ते चॅनेल या घटनाक्रमात काय काय जावईशोध लावण्याचा प्रयत्न करते, हेसुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे. काही कारण नसताना, या चॅनेलने या बातमीला मुस्लिम अँगल देत, ही गर्दी जमवण्यामागे मुसलमान नेत्यांचा हात तर नाही ना? किंवा ही गर्दी जमविण्यामागे जामा मस्जिद जबाबदार आहे का? या विषयावर जणू काही वादविवाद स्पर्धाच घडवून आणल्या. एबीपी न्यूजच्या या बातम्यांनंतर इतर चॅनेलही मस्जिद, मुस्लिम अशा शब्दांवर भर देणाऱ्या बातम्या प्रकाशित करायला लागले. 'न्यूज नेशन'सारखे चॅनेल, ज्या चॅनेलने आपल्या १५ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले, जेव्हा स्वतः प्रधानमंत्र्यांनी मंगळवारीच राष्ट्राला संबोधित करताना सांगितले होते की, या कठीण परिस्थितीत कुठल्याच उद्योगसंस्थेने आपल्या नोकरदारांना कामावरून काढू नये.
खालील लिंक उघडून पाहता येईल की, कुठल्या परिस्थितीत 'न्यूज नेशन' या वृत्तवाहिनीने आपल्याकडे अनेक वर्षांपासून नोकरी करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले.


देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या सूचनेचे पालन न करणारे निर्लज्ज असे हे 'न्यूज नेशन' चॅनेल वांद्रेत झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मात्र आगाऊ राष्ट्रवादाचा आव आणत, मस्जिदीजवळच का गर्दी जमा झाली? या विषयावर फालतु डिबेट घडवून आणते. त्यानंतर लगेचच 'इंडिया टीव्ही'चे संपादक रजत शर्मा एक ट्विट करतात की, "बांद्रा येथे जामा मस्जिदवर झालेली गर्दी चिंतेचा विषय आहे. हे लोक घरी परतण्यासाठी निघाले असे जर मानले तर कुणाजवळ काहीही सामान का दिसले नाही"? अशा प्रकारचे बिनबुडाचे ट्विट रजत शर्मा करतात.
खालील लिंक उघडून जनसत्ताच्या या बातमीत रजत शर्मा यांचे ट्विट पाहता येईल, ज्याकारणाने ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील झाले आहेत.
https://www.jansatta.com/trending-news/rajat-sharma-trolled-after-his-tweet-on-mob-protesting-near-bandra-station-in-mumbai-in-lockdown-covid-19-coronavirus/1378501/

एक कपिल मिश्रा नामक मनुष्य, जो भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यापूर्वी प्रधानमंत्र्यांवर घाणेरडे आरोप करतो. तो सांगत होता की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयएसआयचे गुप्तहेर आहेत आणि ते एका मुलीची जासूसी करतात.
खालील लिंकवर जाऊन 'द प्रिंट'च्या या बातमीवरून याची शहानिशा करु शकता.
https://theprint.in/india/who-is-kapil-mishra-bjp-leader-being-blamed-for-delhi-riots-had-once-called-modi-isi-agent/371226/

मात्र, प्रश्न हाच आहे की, नरेंद्र मोदींवर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन घाणेरडे आरोप करणाऱ्या या कपिल मिश्राला नंतरच्या काळात भारतीय जनता पक्षात प्रवेश कसा काय मिळतो? हा कपिल मिश्रासुद्धा वांद्रेत झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर तंतोतंत रजत शर्मा यांच्यासारखेच मस्जिद, मुस्लिम अशा शब्दांचा वापर करून धार्मिक तणाव निर्माण करणारे ट्विट करतो. हो, हा तोच कपिल मिश्रा आहे, ज्याच्या भाषणामुळे दिल्लीत दंगल भडकली होती आणि मिश्रावर कारवाई करण्याचे आदेश देणाऱ्या एका न्यायाधिशांची रातोरात तडकाफडकी बदलीही करण्यात आली होती.
या सगळ्या घटनाक्रमात ज्या भाजपच्या चमच्यांनी किंवा भाजपच्या पैशांवर पोट भरणाऱ्या चॅनेलवाल्यांनी प्रतिक्रिया दिल्या, त्या अगदी एकसारख्याच होत्या, थोडासाही फरक नाही. अर्थात ही एक संपूर्ण 'गँग' आहे. काय ट्विट करायचे, कुठल्या बातम्या द्यायच्या, कुठल्या शब्दावर जास्त भर द्यायचा, कुठे आगा लावायच्या, याचे आधी सर्वमिळून ही चांडाळचौकडी नियोजन करते आणि मग प्रोपगंडा करते.
अशातच युवासेना नेते वरुण सरदेसाई अचानक या घटनाक्रमात उडी घेतात आणि एबीपी माझाच्या खोट्या बातम्यांवर हल्ला चढवतात. परिणामी एबीपी माझाचे वार्ताहर राहूल कुलकर्णी यांना उस्मानाबाद येथून अटक करण्यात येते. हे राहूल कुलकर्णी म्हणजे त्या चॅनेलचे फक्त एक वार्ताहर आहेत, धार्मिक द्वेषभावना भडकविणाऱ्या 'लीड स्टोरीज्' प्रकाशित करण्याची क्षमता असलेले संपादक नाहीत, हेसुद्धा समजून घ्यावे लागेल.
आता या सगळ्या तांडवात आणखी एक भयाण चित्र, ज्यावर कुणाचेच लक्ष गेले नाही, ते म्हणजे गुजरातमधील सुरत येथे झालेली स्थलांतरित मजुरांची गर्दी. सुरतमधील ही पहिलीच गर्दी नव्हती. काहीच दिवसांपूर्वी तेथे स्थलांतरित मजूर रस्त्यावर उतरले होते, त्यांचा बराचसा उद्रेकही झाला होता. मात्र, जसे वांद्रेत जमलेल्या गर्दीचे वृत्तांकन करण्यासाठी अवघी मीडिया सरसावली, तशी सुरतमधील ही बातमी का दाखवल्या गेली नाही? यावरही विचार झाला पाहिजे. या दोन्ही घटनांना मीडियाने कसे वेगवेगळ्या पद्धतीने कव्हर केले, हेसुद्धा काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे, कारण प्रश्न देशहिताचा आहे.
दरम्यान, लॉकडाऊन झाल्यापासून गायब असलेले गृहमंत्री अमित शाह अचानकपणे जागे होतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करतात. मात्र यापूर्वीच तबलीगी जमातला महाराष्ट्र सरकारने परवानगी का नाकारली म्हणून विचारण्यासाठी तरी अमित शहा फोन करतील, अशी अपेक्षा होती. शिवाय, दिल्लीत तबलीगी जमातच्या मरकज कार्यक्रमाला परवानगी देऊन भारतात कोरोनाचा फैलाव करण्यास मोकळीक देणारे अमित शाह बहुतेक प्रकरण थंड होईपर्यंत कुठेतरी शांत झोपले असावे, जे आता मुंबईत झालेल्या गर्दीमुळे महाराष्ट्र सरकार संकटात सापडलेले असताना जागी झाले?
https://www.ndtv.com/india-news/amit-shah-on-protests-at-mumbais-bandra-such-events-weaken-fight-against-coronavirus-2211766

मुद्दा इथेही संपत नाही. याउप्परही मुंबई आणि सुरत येथील दोन्ही घटनांना मीडिया कशी वेगवेगळ्या पद्धतीने कव्हर करते, ही मजेशीर लपंडावयुक्त बातमीबाजी पाहणे तेवढे महत्त्वाचे राहील.
१) मुंबईच्या गर्दीबद्दल मीडियात बातम्या प्रसारित होतात की, हे एक षड्यंत्र आहे, परंतु सुरतमध्ये झालेल्या गर्दीबद्दल कुठल्याच चॅनेलला कुठलेही षड्यंत्र दिसून पडत नाही.
२) मुंबईत झालेल्या गर्दीबद्दल अचानक मस्जिदचा शोध लागतो, कुण्यातरी मुसलमान नेत्याने ही गर्दी जमवल्याच्याही 'फेक न्यूज' प्रसारित होतात, परंतु सुरतमध्ये ना कुठल्या मस्जिदचा उल्लेख, ना त्यावर कुठले चर्चासत्र.
३) मुंबई प्रकरणात गृहमंत्री बऱ्याच दिवसांनंतर सक्रिय झाले. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा केली, परंतु सुरतसंदर्भात तेथील मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासोबत अमित शहांचा कुठलाच वार्तालाप नाही, जेव्हा की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य गुजरातमधील सुरतमध्ये स्थलांतरित मजुरांची वांद्रेपेक्षाही दुप्पट गर्दी आणि दुप्पट उद्रेक होतो.
४) मीडियाने मुंबई येथील गर्दीप्रकरणाला जोरदारपणे कव्हरेज दिले. त्यावर अनेक जणांना आमंत्रित करून 'वादविवाद स्पर्धा'देखील घेतल्या, परंतु सुरतमध्ये लॉकडाऊनच्या काळात दुसऱ्यांदा मजूर रस्त्यावर उतरलेले असतानाही मीडियात बातमी नाही, म्हणजे सगळीकडे "हाक ना बोंब".
५) मुंबईत झालेल्या गर्दीचा संपूर्ण दोष पोलीस प्रशासनावर ढकलला गेला, परंतु सुरतमध्ये झालेल्या गर्दीचा दोष कुणावर ढकलावा, म्हणजे मुख्यमंत्री विजय रूपानी की रूपानी यांच्या शासनातील पोलीस प्रशासनावर? हा प्रश्न मीडियापुढे आ वासून बहुतेक उभा असावा.

एकंदरीत महाराष्ट्र राज्यात बीजेपी सत्तेपासून दूर होणे म्हणजे खोट्या बातम्या प्रसारित करून केंद्र सरकारचे गुन्हे झाकणाऱ्या इलेक्ट्रॉनिक गोदी मीडियाच्या तोंडावर ही झणझणीत चपराक होती. गर्दी दोन्हीही राज्यात झाली. साहजिकच त्याला दोन्हीही राज्यातले सरकार जबाबदार आहेत, परंतु मीडियाने या प्रकरणात गुजरात सरकारचा गुन्हा झाकून महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केले, असे दिसते. शिवाय प्रत्येक बातमीत कारण नसताना मुस्लिम आणि मस्जिदीचा उल्लेख करून, महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे कारस्थान रचले जात असल्याचेही प्रकर्षाने दिसून येते. महाराष्ट्रातील कुठल्याही भागात लॉकडाऊनच्या काळात कथित सोशल डिस्टन्सिंगचा भंग होणे काय आणि महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम दंगली होणे काय, डोकेदुखीत भर महाराष्ट्र सरकारच्याच पडणार आहे. त्यामुळे ज्याप्रकारे उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ सरकारने तेथील पोलीस प्रशासनाला मीडियाच्या खोट्या बातम्यांवर लक्ष देण्याची जबाबदारी सोपवली, तशी यंत्रणा महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित करण्याची गरज आहे. अन्यथा, या लबाड इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्या मुंबईत गोंधळ घालून गुजरातसमोर मुजरा करायला तयारच आहेत.

1 comment:

  1. खूप महत्त्वाची माहीत व मुद्देसूद लिहले आहे..

    ReplyDelete